काशीमीरा पोलिस ठाण्यात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या १९ नागरिकांवर गुन्हा दाखल

काशीमीरा पोलिस ठाण्यात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या १९ नागरिकांवर गुन्हा दाखल



मिरा-भाईंदर शहरात कोरोना रोगाचा कहर वाढत असताना नागरिकांना शासनाकडून सतत जागृतीचे, सतर्क राहण्याचे आदेश देण्यात येत असतानाही काशिमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या विभागात मॉर्निंग वॉकच्या नावाखाली निघालेल्या १९ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


देशभरात कोरोना रोगाच्या विषाणूने कल्लोळ माजवला आहे. देशामधील नागरिकांमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झालेले आहे. महाराष्ट्रातली गंभीर परिस्थिती पाहता आणि त्यातल्या त्यात मुंबई शहराची कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या ही चिंता वाढवणारी आहे. मुंबईला लागूनच असलेल्या मीरा-भाईंदर शहरांमध्येही कोरोना चा कहर वाढत गेलेला पाहायला मिळत आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या २२ वर पोहोचली आहे तर त्यात एका रुग्णाला आपला जीवही गमवावा लागला आहे. अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली असताना,शहरातले अनेक विभाग अति संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यात मेडतिया नगर,नया नगर, नारायण नगर, विनय नगर, एस. व्ही.रोड, नित्यानंद नगर, र्ब्रॉडवे या परिसरानां  सील करण्यात आले आहे. अशी परिस्थिती शहरात उद्भवलेली असतानाही काशिमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या विभागातील काही नागरिक सकाळी पहाटेच्या दरम्यान मॉर्निंग वाकच्या नावाखाली फिरताना पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली गेली आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ बी , 
कोव्हीड १९ उपाययोजना नियम२०२०, व भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम १८८,२६९,२७०,२७१ नुसार ही कारवाई केली गेली आहे. शहरात  गंभीर परिस्थिती उद्भवलेली असतानाही अनावश्यकपणे, मोकटपणे फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असताना पोलिसांनी याला लगाम लावण्यासाठी ही कारवाई केल्याचे समजत आहे.