उलट सुलट चर्चेला पूर्णविराम प्रभाग अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी तब्बल सहा दिवसानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

उलट सुलट चर्चेला पूर्णविराम प्रभाग अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी तब्बल सहा दिवसानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


मिरा-भाईंदर मनपा प्रभाग समिती क्रं. ६ चे प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांना प्रभाग कार्यालय येथे मनसेच्या व इतर काही कार्यकर्त्यांनी कार्यालयात दारूची पार्टी सुरू आहे म्हणत गोंधळ घातला, व मोबाईल द्वारे फेसबुकवर लाईव्ह येत त्याचे चित्रण केले. प्रभाग कार्यालयात दारूची पार्टी सुरू आहे असे आरोप केले व प्रभाग अधिकाऱ्यास मारहाण केली होती या प्रकरणात तब्बल ६ दिवसानंतर प्रभाग अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुख्य चार जनासह इतर ३५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


 


मुंबई उपनागराला लागूनच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर मनपाच्या मिरारोड पूर्व मधिल रामनगर येथिल प्रभाग समिती कार्यालय क्रं.६ मध्ये, १६ ऑगस्ट रोजी रविवारी पावने ४ वाजताच्या दरम्यान काही मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर संस्थेचे कार्यकर्ते गेले असता त्यातील एका कार्यकर्त्याने फेसबुक वर लाईव्ह केले होते. प्रभाग कार्यालयाच्या येथे दारूची पार्टी सुरु असल्याचा आरोप करत जमलेल्या जमावाने गोंधळ घातला, आम्ही कार्यालयात आल्यामुळे दारूची बाटली व इतर ,ग्लास खाली फेकून देण्यात आले असे आरोप केले गेले . त्याच बरोबर त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना दमदाटी करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. प्रभाग अधिकाऱ्यांना दमदाटी करत शिवीगाळ केली गेली, प्रभाग अधिकारी याना तुमचा चेहरा लोकांना दाखवा म्हणत त्यांच्या तोंडावर लावलेला मास्क खेचण्यात आला त्यावेळी प्रभाग अधिकारी यांनी विरोध केला असता काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली होती, 


उपस्थित असलेल्या काही जणांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. फेसबुक या समाजमध्यातून केलेल्या लाईव्ह मुळे शहरात चर्चेला उधाण आले होते एवढे होऊन ही प्रभाग अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवली नव्हती. एवढया उशिरा तक्रार देण्याचे कारण विचारण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधन्याचा प्रयत्न केला पण फोन लागला नाही म्हणून कारण कळू शकले नाही. ही घटना घडली त्यावेळी कार्यलयात प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे , नरेंद्र चव्हाण, निवृत्त अधिकारी दादासाहेब खेत्रे हे उपस्थित होते त्यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की, आम्ही दारू पिलेली नाही तसा काही प्रकार नाही, कोणतीही पार्टी केली नाही वाटल्यास आमची वैद्यकीय चाचणी करा असे उपस्थित समुदायाला विनंती केली पण कार्यकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते त्यांनी आयुक्तांना फोन लावला व नंतर पोलिसांना पाचारण केले. कार्यालयात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते की, शीतल नगर येथील गटारात पडून मरण पावलेल्या तरुणा प्रकरणी प्रभाग अधिकाऱ्यांचा काहीही संबंध नसतानाही अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात येत असल्याने आयुक्तांना निवेदन दयायचे होते ते बनवण्यासाठी आम्ही एकत्र येऊन निवेदन बनवत होतो असे सांगितले पण कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती अधिकाऱ्यावर आरोप करत सांगितले तुम्ही आम्ही आल्यामुळे बाटली , ग्लास खाली फेकले आहे ते आम्ही बघितले आहे असे म्हणत ग्लास व काचेची फुटलेली बॉटल अधिकाऱ्यांनाआणून दाखवली.


 


 काशिमीरा पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहचले परस्थितीची पाहणी केली पण दारू पीत होते या तसा कोणताही पुरावा पोलिसांना आढळून आला नाही. तिथे असलेल्या सर्वाना पोलिस ठाण्यात घेऊन गेले होते. पालिका अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी करून घेऊन ही. प्रभाग अधिकारी यांनी तक्रार न दिल्याने गेल्या सहा दिवसापासून उलट सुलट चर्चा सुरू होत्या त्या चर्चानां अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अखेर तब्बल सहा दिवसानंतर प्रभाग अधिकारी यांनी तक्रार दिली आणि काशिमीरा पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.र.नो.क्रं. ६५७ भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम १४३,१४७,१४९, ३४१,३२३,५०४,५०६,४२७ प्रमाणे विकास फाळके, सचिन पोफळे, सुनिल कदम , करण कांडनगिरे मुख्य चार जनासह इतर ३५ जणांवर गुन्हा नोंद केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की, एका शासकीय अधिकाऱ्याला शासकीय कार्यालय येथे मारहाण केली होती पण रविवार दिवस असल्याने पोलिसांनी त्या दिवशी प्रभाग अधिकारी हे कर्तव्यावर हजर होते का या बाबत पोलिसांनी मनपा कडे प्रभाग समिती अधिकारी कर्तव्यावर हजार होते की नाही हे स्पष्ट करण्यासाठी लेखी माहिती देण्यात यावी अशी माहिती मागवण्यात आली आहे. जर ते कर्तव्यावर हजर होते अशी माहिती मिळाली तर आणखी काही कलमें सदर गुन्ह्यात लागू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.